स्थानिक शेगाव बु येथून जवळच असलेल्या दादापुर या गावाला जोडणारा रस्ता अपघाताला आमंत्रण देत आहे.दादापुर ते शेगाव बु या डांबरी रस्त्याची गेल्या दहा वर्षांच्या काळात एकदाही दुरुस्ती झाली नाही. या डांबरी रस्त्यावरील मोठमोठे खड्डे गेल्या अनेक दिवसांपासून परिसरातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरले आहे. आता मात्र या रस्त्याचे दुरुस्ती शक्य नाही, तर रस्ताच नव्याने तयार करावा लागणार आहे.
10 ते 15 वर्षाआधी हा डांबरी रस्ता तयार करण्यात आला होता. आता या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाल्याने रस्त्यावरून चालताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. मानोरा-कारेगाव -आष्टा – कोकेवाडा -धानोली -दादापुर परिसरातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांची या शिवारात शेती असल्याने व शेगाव बु ही मुख्य बाजारपेठ असल्यामुळे नागरिकांना दररोज याच रस्त्यावरून ये-जा करावी लागते. शेतीच्या हंगामात याच रस्त्यावरून शेतमालाच्या गाड्या भरून जातात. तसेच मानोरा- दादापुर -धानोली येथील नागरिकांसाठी दुसरा रस्ताच नसल्याने त्यांनाही याच रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. मालवाहतूकही येथूनच होते. या सर्व कारणांमुळे आणि रस्त्यावरील रहदारीमुळे रस्ता सुव्यस्थितीत असणे गरजेचे आहे. मात्र, या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कधी या रस्त्याच्या दुर्व्यस्थेमुळे कोणाचा जीव जाईल हे नाकारता येत नाही. परिसरातील नागरिकांनी रस्त्याच्या कामाबद्दल अनेकदा संबंधित विभागाला विनंती करूनही उपयोग झाला नाही. हा रस्ता अनेक ठिकाणी दुतर्फा बाजूने खचला असून, ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याची खडी निघून गेली आहे.रात्री-बेरात्री येथून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. या रस्त्याचा वापर करणारे तीन-चार गावांतील नागरिक आता सरकारी दिरंगाईला वैतागले आहेत. लवकरच रस्त्याचे काम हाती घेण्यात आले नाही तर आंदोलनाची तयारी नागरिकांना करावी लागणार अशी माहिती पूजा फॉउंडेशन चे अध्यक्ष अमोल मोरेश्वर नन्नावरे यांनी दिली.
प्राणहानी झाल्यावरच प्रशासनाला जाग येईल का? अमोल मो नन्नावरे अध्यक्ष तंमुस व पूजा फॉउंडेशन


Add Comment